• Total Visitor ( 670340 )

दीपक केसरकर यांना अटक करा, संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी

Raju Tapal June 25, 2023 332

दीपक केसरकर यांना अटक करा,संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी



 



सातारा:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं होतं. त्या काळात ते गोळी घालून आत्महत्या करणार होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.केसरकर यांच्या या धक्कादायक खुलाश्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रतिक्रिया उमटत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट दीपक केसरकर यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच केसरकर यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे.



 



संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांना दीपक केसरकर यांच्या विधानाबाबत विचारले असता राऊत यांनी केसरकर यांच्या विधानाची खिल्ली उडवली. एकनाथ शिंदे यांनी आत्महत्येबाबत केसरकरांशी चर्चा केली असेल. काही लोक सती जातात. मालक गेल्यावर सती जातात. तसे हे लोकही जाणार होते का? केसरकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. आत्महत्येची एवढी मोठी माहिती दडवली कशी? इतक्या मोठ्या महान नेत्याने आत्महत्या केली असती तर देशावर, राज्यावर आणि जगावर संकट कोसळलं असतं. त्यामुळे केसरकरांना अटक करा, अशी उपरोधिक टीका करत संजय राऊत यांनी मागणी केली.



 



मणिपूर येथील हिंसेवरून त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मणिपूरविषयी पंतप्रधान कधीच बोलणार नाहीत. त्यांच्या हातून मणिपूर गेलं आहे. मणिपूरमध्ये हिंदू-मुस्लिम वाद करता येत नाही. ते करता आलं असतं तर पंतप्रधान बोलले असते, असा टोला राऊत यांनी पंतप्रधानांना लगावला.



 



बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित होते. ते जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूलाच बसले होते. त्याबाबतही राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. मेहबूबा मुफ्ती या मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. त्यामुळे आधी मोदींना विचारा ते का गेले होते? त्यानंतर भाजपने आम्हाला सवाल करावा, असं हल्लाच त्यांनी भाजपर चढवला.



 



वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला. त्यावर अजून उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेलं नाही. त्याबाबत छेडले असता राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली. प्रकाश आंबेडकरांच्या या कृतीवर आम्हाला जिथे बोलायचं आहे, तिथे आम्ही बोललो आहोत. त्यावर आम्हालाच काय विचारता? भाजप हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आहे ना? मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी त्यावर बोलावं. प्रकाश आंबेडकर यांना जाब विचारण्याची शिंदे आणि फडणवीस यांच्यात हिंमत आहे काय? असा सवाल त्यांनी केला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement