ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई;खून प्रकरणातील दोन आरोपी २४ तासांच्या आत जेरबंद
ठाणे :-ठाणे पश्चिम येथील पोखरण रोड क्रमांक २ परिसरात झालेल्या खून प्रकरणाचा छडा लावत ठाणे शहर गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-५ पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,५ जून रोजी हनुमान मंदिराजवळ एका इसमास मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या वागळे युनिट-५ ने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. आरोपी उत्तर प्रदेशकडे पलायन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले. पोलिसांनी कसारा रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून अजय देवकीलाल गिरी (वय २८) व शिवा संजय गोरखावी (वय २७) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी १२ संशयित व्यक्तींनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे खून प्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकला असून पुढील तपास वर्तकनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले,पोलीस उपायुक्त (गुन्हे) पराग मनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या नेतृत्वात वागळे युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले व त्यांच्या पथकाने पार पाडली.