पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून कमकुवत झालेल्या वृक्षांच्या छाटणीचे काम महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत युध्द पातळीवर सुरु !
पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे झाडे कोसळून घरांचे पत्रे तुटणे व इतर दुर्घटना उद्धवण्याचा संभव असतो. कल्याण डोंबिवलीचा परिसर भौगोलिकदृष्ट्या खाडी किनारी असल्याने भुसभुशीत जमीनीमुळे तसेच सर्व परिसरात सुरु असलेल्या कॉक्रीटीकरणाच्या प्रक्रीयेमुळे झाडांची मुळे कमकुवत होतात. अशा परिस्थितीत ही झाडे कोसळण्याची शक्यता वाढते. सन 2024-25 मध्ये महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत केलेल्या वृक्ष गणनेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात 7 लाख 36 हजार वृक्ष आढळून आले आहेत. तथापि गेल्या तीन वर्षाची सरासरी पाहता दरवर्षी सुमारे 700 ते 800 झाडे कोसळल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे झाडे कोसळून होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पथके वृक्ष छाटणीचे काम निरंतर करत असून,हे काम यापुढेही सुरु राहणार आहे. माहे मार्च 2026 ते अद्यापपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागातील सुमारे 974 धोकादायक झाडांची छाटणी करण्यात आली असून,27 धोकादायक झाडे पुर्ण तोडण्यात आली आहेत,महापालिका आयुक्त अभिनव गोयल हे स्वतः देखील याचा नियमित आढावा घेत आहेत अशी माहिती मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी दिली आहे. महावितरणने(MSEDCL) ने सुद्धा पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होवू नये म्हणून विद्युत वाहिन्यांवर असलेल्या झाडांची छाटणी केली आहे .