माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील’ स्पर्धेत युवक-युवतींनी सहभागी व्हावे
जलसंधारण दिनानिमित्त 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा; प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपयांचे पारितोषिक
ठाणे:- 21 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जलसंधारण दिनानिमित्त दि. 15 ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील’ ही समाजमाध्यमावरील रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी फरीद खान यांनी केले आहे. या स्पर्धेचे घोषवाक्य ‘माती वाचवा,पाणी वाचवा,सुरक्षित उद्या घडवा’ असे आहे. युवक-युवतींनी आपल्या रीलच्या माध्यमातून मातीसंवर्धन,जलसंधारण,पाणी बचत,पारंपरिक जलसंधारण पद्धती तसेच नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा संदेश प्रभावीपणे मांडावा. स्पर्धकांनी 30 ते 60 सेकंदांची रील तयार करून ती आपल्या सार्वजनिक समाजमाध्यम खात्यावर प्रसिद्ध करावी. रीलच्या सुरुवातीला स्पर्धेचा उद्देश,स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव सांगणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित विभागाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्याला टॅग करणे आणि #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट रीलची जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या माध्यमातून निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांना ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ या नावाने सन्मानित करण्यात येणार असून,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रकासह प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपये,द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयाने मान्यता दिलेल्या संस्थेमार्फत एक अधिकृत QR Code तयार करण्यात येईल. QR Code स्कॅन केल्यानंतर नोंदणी → Reel Link सादर करणे → जिल्हा निवड → पडताळणी → सहभाग प्रमाणपत्र अशी सुलभ प्रक्रिया राहील. https://register.mahaevent.co.in स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://register.mahaevent.co.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. ‘एक रील... मातीसाठी! एक रील... पाण्यासाठी! एक रील... सुरक्षित भविष्यासाठी!’ या संदेशासह जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या अभिनव उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी फरीद खान यांनी केले आहे.