जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात फुलांच्या बुक्यांना पूर्णविराम!
आता शालेय साहित्य, ज्ञानवर्धक पुस्तके व फळझाडांची रोपे देऊन मान्यवरांचे स्वागत!!
• सिईओ संजिता मोहपात्र यांचा अभिनव उपक्रम
• विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व प्रोत्साहन आणि वृक्षलागवडीला चालना देऊन हरित जिल्हा घडविण्याचा उददेश
प्रतिनिधी
अमरावती :- जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत सर्व कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये, मान्यवरांचे स्वागत करताना ताज्या फुलांच्या बुके ऐवजी शालेय साहित्य, ज्ञानवर्धक पुस्तके, फळझाडांची रोपे देण्याची किंवा स्वीकारण्याची नविन पद्धत अंमलात आणण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांनी परिपत्रक निर्गमित केले आहे.
अमरावती जिल्हा परिषदेतंर्गत विविध कार्यालर्याव्दारा अनेकवेळा बैठकांचे आयोजन होत असते. अशा वेळी राजशिष्टाचार म्हणून मान्यवरांचे स्वागत फुलांच्या बुके ऐवजी शालेय साहित्य, ज्ञानवर्धक पुस्तके, फळझाडांची रोपे देण्याची किंवा स्वीकारण्याची नविन पद्धत सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुषंगाने जिल्हा परिषद अमरावती अतंर्गत विविध कार्यालये, पंचायत समिती, तालुका कार्यालये, ग्रामपंचायती इत्यादी व्दारे आयोजित करण्यात येणारे सार्वजनिक तथा शासकीय समारंभामध्ये मान्यवरांच्या स्वागतासाठी किंवा सन्मानीय लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे स्वागतासाठी बुके ऐवजी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी उपयोगी ठरणारे शालेय साहित्य (उदा. वह्या, पेन, पेन्सिल, ड्रॉइंग साहित्य इ.), ज्ञानवर्धक पुस्तके (विशेषतः मुलांसाठी वा वाचनालयासाठी उपयुक्त), फळझाडांची रोपे, (उदा. आंबा, सिताफळ, आवळा, चिंच इ.) फुल रोपे याप्रकारचे साहित्य देण्या - घेण्याची पध्दत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कृती फक्त स्वागतापुरती मर्यादित नसून सामाजिक जबाबदारी म्हणूनही अंगीकारावी. अशा पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व प्रोत्साहन आणि वृक्षलागवडीला चालना देऊन हरित जिल्हा घडविण्याचा उददेश असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांनी सदर परिपत्रकातून नमूद केले आहे.