अपहरण झालेल्या बालकाला भेटण्यासाठी नांदेडवरून निघालेल्या आत्याचा अपघाती मृत्यू
बाणेर पुणे येथील अपहरण झालेला ४ वर्षीय स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोहोचल्याची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेडवरून भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अहमदनगर - औरंगाबाद रोडवर इंद्रायणी हॉटेल जवळ अपघाती मृत्यू झाला.
सुनिता संतोष राठोड चव्हाण वय -३६ यांचा चारचाकी अपघातात मृत्यू झाला असून त्यांची दोन मुले व पती अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
समर राठोड वय - १४, अमन राठोड वय - ६ अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाल्याचे विश्वनीयरित्या समजते.
दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यातील बाणेर येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पुण्यातील बालेवाडी हाय स्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून स्वर्णव चव्हाण या ४ वर्षीय बालकाचे ११ जानेवारीला अपहरण करण्यात आले होते.
स्वर्णव चव्हाण हा ४ वर्षीय बालक सापडल्यानंतर अपहरण बालकाला शोधण्यास पोलीसांना यश या शिर्षकाखाली टिटवाळा न्यूजने गुरूवार दि.२० जानेवारीला वृत्त प्रसारित केले होते.
स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटूंबिय ,बाणेर.परिसरात साजरा केला जात असतानाच स्वर्णव चव्हाण याच्या आत्याचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.