मुंबई-गोवा महामार्गावरील अडचणी दूर करण्यासाठी अजित पवारांचे ठोस आदेश
मुंबई :- मुंबई-गोवा महामार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोलाड ते माणगाव दरम्यानच्या सर्व बायपाससाठी २१ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस मंत्रालयीन व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी तसेच मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाची डागडुजी व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची गरज असल्याचे खासदार तटकरे यांनी मांडले. जनआक्रोश समितीने १० ऑगस्ट रोजी पळस्पे फाटा, पनवेल येथे पाटपूजा करून आंदोलन सुरू केल्याची बाबही यावेळी निदर्शनास आणण्यात आली.
जनआक्रोश समितीच्या मागण्यांना पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पवार यांनी अपूर्ण बोगद्यांमुळे वाहतूक अडथळा येत असलेल्या ठिकाणी कामे पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर केला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून ही कामे पूर्ण होईपर्यंत देखरेख करण्याचे निर्देश दिले.महामार्गावरील खड्ड्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याची व तक्रार मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत कार्यवाही करण्याचीही सूचना पवार यांनी दिले आहे.