राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मान्यता;
मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
या निर्णयामुळे अनेक महिने थांबलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला येणार वेग
मुंबई :- राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज संपली आहे. आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत तब्बल १५ हजार पोलीस पदांच्या भरतीसंदर्भात निर्णय झाला आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत १५ हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक महिने थांबलेल्या भरती प्रक्रियेला वेग येणार असून, पोलिस दलाला ताज्या दमाचे मनुष्यबळ मिळणार आहे.
राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी सुरू होण्याची अपेक्षा होती, मात्र प्रशासकीय कारणांमुळे ती लांबणीवर गेली. यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच भरती जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आहे. या भरतीद्वारे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील तसेच शहरातील हजारो उमेदवार पोलीस दलात सामील होण्यासाठी सज्ज आहेत. महायुती सरकारने राज्यातील सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिस दलात ताज्या आणि ऊर्जावान तरुणांचा समावेश झाल्याने कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा टप्प्यांचा समावेश असणार आहे. तसेच पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्याचा सरकारचा मानस आहे. महायुती सरकार आल्यानंतर पोलीस भरतीच्या तारखेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आजचा दिवस निर्णायक ठरला आहे.