भारत-पाकिस्तान तणावादरम्यान केंद्र सरकारचा मोठा निर्णय;
32 विमानतळं 15 मेपर्यंत राहणार बंद
नवी दिल्ली :- भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताकडून 32 विमानतळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक दिवशी 400 हून अधिक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. विमानन नियामक डीजीसीएने सांगितलं की, ही बंदी 9 मेपासून 15 मेपर्यंत सकाळी 5.29 पर्यंत राहील. त्यामुळे प्रवाशांनी आपला प्रवास रिशेड्यूल करा आणि यासाठी संबंधित एअरलाइन्सशी संपर्क करा. सरकार आणि सुरक्षा एजन्सी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेईल.
पाकिस्तानने शुक्रवारी सलग दुसऱ्या रात्री जम्मू काश्मीरपासून गुजरातपर्यंत 26 ठिकाणांवर ड्रोल करण्याचा प्रयत्न केला जो भारताने हाणून पाडला. पाकिस्तानकडून विमानतळ आणि महत्त्वपूर्व ठिकाणांवरील ड्रोन हल्ले भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले.अशा परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव भारतातील 32 हून जास्त विमानतळं 15 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाक हल्ल्यानंतर दिल्ली विमानतळावर सुरक्षा वाढवली आहे. दिल्ली विमानतळावरुन 138 उड्डाणे रद्द करण्यात आली असून आज नागरी आणि आंतरराष्ट्रीयसह एकूण 138 विमान रद्द करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली विमानतळावर येणाऱ्या चार आंतरराष्ट्रीय विमानं रद्द करण्यात आली आहेत.
पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, पटियाला, भटिंडा, हलवारा, पठाणकोट विमानतळ बंद राहतील, तर हिमाचल प्रदेशातील भुंतर, शिमला, कांगडा-गग्गल विमानतळ बंद राहतील. केंद्रशासित प्रदेशातील चंदिगड विमानतळ, श्रीनगर, जम्मू, जम्मू-काश्मीरचे लेह विमानतळ आणि राजस्थानचे लडाख, किशनगड, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर विमानतळ आणि गुजरातचे मुंद्रा, जामनगर, हिरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज विमानतळ बंद राहतील. एअर इंडिया आणि इंडिगोने अनेक विमानतळांवरील उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगोने ग्राहकांना फ्लाइटची स्थिती तपासण्यासाठी, रीबुकिंग करण्यासाठी किंवा परतावा मिळविण्यासाठी लिंक्स शेअर केल्या आहेत. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. दरम्यान, एअरमनला नोटीस जारी करण्यात आली आहे. पाकिस्तानने काल रात्री जम्मू, पंजाब आणि राजस्थानच्या भागांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले.