चासकमान कॅनाॅलचे पाणी सोडण्याबाबत शिक्रापूर ग्रामपंचायतीची मागणी
शिरूर :- शिक्रापूर परिसरातील वेळ नदी, राऊतवाडी, वाबळेवाडी,बुधेवस्ती, चारी नंबर ११,१२,१३ ला चासकमान कॅनाॅलचे पाणी सोडावे अशी मागणी शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश बबनराव गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी एस शिंदे यांनी शिक्रापूर येथील चासकमान पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चासकमान पाटबंधारे विभाग शाखाधिका-यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, शिक्रापूर येथील वेळनदी,बंधारे, राऊतवाडी,बुधेवस्ती येथे पाणी नाही.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विहीरीचे पाणी आटले आहे.वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजना देखील बंद पडलेल्या आहेत.शेतक-यांच्या खाजगी विहीरीही आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चा-याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे.
सध्या चासकमान प्रकल्पाचे पाणी कॅनालला सोडलेले असून सदर कॅनाॅलचे पाणी शिक्रापूरमधील सर्व ओढ्यांना व तळ्यामध्ये सोडण्यात यावे.पाणी सोडल्यास पाणीपुरवठा विहीरीची व कुपनलिकेची पाणीपातळी वाढण्यास मदत होईल.गावातील वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणे तसेच जनावरे जगविणे शक्य होईल.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )