महापालिका शाळांमध्ये आता दर शुक्रवारी राबविणार वाचन उपक्रम !
शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पाठ्य पुस्तकीय ज्ञान पुरेसे नसून,त्यांच्यात अवांतर वाचनाची गोडी निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील भाषा अधिक समृध्द व्हावी आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची वृद्धी व्हावी,या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये दर शुक्रवारी वाचन उपक्रम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शुक्रवारी शाळेच्या परिपाठानंतरची पहिली तासिका ,वाचन तासिका म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे आणि या तासिकेत वृत्तपत्र वाचन, कथा वाचन किंवा निवडक साहित्याचे वाचन करण्यात येईल. शाळा स्तरावर वेळोवेळी वाचन स्पर्धांचे आयोजन करुन, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे तसेच आपापल्या शाळेत सर्व शिक्षकांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिल्या आहेत. या वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून, भाषेवर प्रभुत्व मिळविणे,त्याचप्रमाणे वाचलेल्या विषयाचे योग्य आकलन करुन त्यावर विचार करणे विद्यार्थ्यांसाठी सुलभ होणार आहे. वाचन उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गास स्व: अभ्यासाची सवय लागून,त्यांच्या ज्ञानातही भर पडणार आहे. कालच्या (शुक्रवार) वाचन उपक्रमात महापालिका क्षेत्रातील 252 शाळांमधील सुमारे 52000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा वाचन उपक्रम यापुढे नियमित स्वरुपात सुरु राहील,अशी माहिती महापालिकेचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे आणि शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी दिली आहे.