अणुस्कुरा घाटात भिषण अपघात
इर्टिगा कार चारशे फुट खोल दरीत कोसळुन लांजा येथील तरुणाचा मृत्यु
राजापूर :- मागील काही महिने वाहतूकिसाठी धोकादायक बनलेल्या अणूस्कुरा घाटात बुधवारी एक इर्टिका सुमारे चारशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली असून मयत व्यक्तीचे नाव कौस्तुभ विजय कुरूप वय ३० असून तो लांजा येथील रहिवाशी होता.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार मयत कौस्तुभ हा आपल्या कामानिमित्त कोल्हापूरला गेला होता.मंगळवारी ३ जूनला तो आपल्या गावी येत असताना अणूस्कुरा घाटात त्याच्या गाडीला भीषण अपघात घडलाआणि काही क्षणातच गाडी बाजूला असलेल्या खोल दरीत जावून कोसळली. अपघातग्रस्त गाडीची पुरतीच चाळण झाली होती. गाडीचे अवशेष विखूरल्या अवस्थेत होते.गाडीचे इंजन तर खाली रस्त्यावर येऊन पडले होते. मयत कौस्तुभचे पार्थिव एका बाजूला जावून पडले होते.घाटातील धुक्यामुळे अपघाताचा तसा कुणालाच अंदाज आला नाही.दरम्यान घाटमार्गे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रस्त्यावर पडलेले इंजन आढळून आले आणि त्याने अणूस्कुरा घाटातील चेक पोस्ट वर असलेल्या पोलीसांना त्याची कल्पना दिली. त्या माहितीच्या आधारे अणूस्कुरा चेक पोस्ट वरील पोलीसांनी घाटात जावून पहाणी केली असता त्यांना झालेल्या अपघाताची माहिती मिळाली.त्यानंतर राजापूरचे पोलीस नि्रीक्षक अमित यादव, लांजाचे पोलीस नि्रीक्षक नीलकंठ बगळे आपापल्या कर्मचाऱ्यांसह अणूस्कुरा घाटात दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ देखील अपघाताचे वृत्त समजताच धावून आले. मयत कौस्तुभचा मृतदेह वरती काढण्याचे काम सुरु होते. पडत असलेल्या पावसामुळे कामात व्यत्यय येत होता. मयत कौस्तुभ हा लांजा तालुक्यातील होता. अशी माहिती मिळाली.त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून लांजा येथून अनेक ग्रामस्थांनी घाटाकडे धाव घेतली.