गुरुजी फिल्डवर अन् विद्यार्थी वाऱ्यावर
शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा ताण
अमरावती- एकीकडे शैक्षणिक गुणवत्तेचा उदो उदो करायचा आणि दुसरीकडे शिक्षकांना अशैक्षणिक कामांच्या खाईत लोटायचे,असे दुटप्पी धोरण सध्या शासन,प्रशासनाने अवलंबले आहे. एप्रिलमध्ये 'एसआयआर' आणि 'जनगणना' ही दोन महत्त्वाची राष्ट्रीय अभियाने केंद्र शासनाद्वारे हाती घेतली आहे. या दोन्ही मोहिमांची मदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) असलेल्या शिक्षकांवर राहण्याची शक्यता आहे. आधीच शिक्षकांवर अनेक अशैक्षणिक कामे लादण्यात आली आहे. आता ऐन परिक्षा आणि निकालाच्या तोंडावर 'एसआयआर' आणि 'जनगणना' ची कामे देण्यात आलीअसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. मोहिमांचे प्रशिक्षण,वार्षिक परीक्षा,निकाल आणि इतर शैक्षणिक कामकाज असताना,प्रशासनाद्वारा नोटीस आणि कारवाईचा धाक दाखवून शिक्षकांना कामाला जुंपल्याचे चित्र जिल्हात पाहायला मिळत आहे. शिक्षण क्षेत्रातील कामाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी शासन-प्रशासनाने शिक्षकांना कायमच 'सॉफ्ट टार्गेट' केल्याचा आरोप जिल्ह्यात होत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा आणि निकालाचा महत्त्वाचा काळ आहे. अशातच 'एसआयआर' पूर्वतयारीची कामे लादल्याने शिक्षकांची मोठी गोची झाली आहे. 'काम करा अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा,'अशा शब्दांत महसुल प्रशासनाकडून तंबी दिली जात आहे. यामुळे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यायचे की, अशैक्षणिक कामेच करायची,असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. शिवाय 'बीएलओ'च्या कामात थोडा जरी उशीर झाला किंवा त्रुटी राहिली,तर थेट कारणे दाखवा नोटीस प्रशासनाद्वारा बजावल्य जात आहेत. सध्या शिक्षक शाळेत कमी आणि बीएलओच्या कामात जास्त व्यस्त झाले असल्याचे दिसून येते. परीक्षा की एसआयआर एप्रिल महिन्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वार्षिक परीक्षांचे नियोजन असते. विद्यार्थ्यांकडून सराव करून घेणे,परीक्षेचे पेपर काढणे,तपासणे आणि निकाल तयार करणे ही मुख्य शैक्षणिक कामे सोडून शिक्षकांना आता गृहभेटीद्वारे माहिती गोळा करावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्गात शिकवायचे सोडून मतदार याद्यांचे प्रमाणीकरण,मॅपिंगच्या कामातच त्यांचा दिवस जात असल्याचे चित्र आहे. तसेच या महीण्यात वर्ग १ते९वर्गाची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे. तसेच नविन शैक्षणिक सञा करीता पटनोंदणी करणे त्या करीता विद्यार्थी शोधावे लागतात ही महत्वाची शैक्षणिक कामे आहे.एस आयआरचे काम परीक्षा संपल्या नंतर करण्यात यावे. अशी मागणी संबंधित शिक्षक करीत आहे.आता शिक्षण विभाग ११ते२२मार्च परीक्षा काळात पटपडताळणी करणार आहे. त्यामुळे शाळेत १००%विद्यार्थी हजर राहणे महत्वाचे आहे. पण या करीता शाळेत शिक्षक उपस्थित असणे महत्वाचे आहे. पण संध्दाच्या अशैक्षणिक कामा मुळे शिक्षक वर्गात कमी तर गावात घरोघरी जातांना दिसत आहे.