कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई :- राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे.पुणे शहरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. मुंबईतील अनेक भागांत बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे.या पावसाचा जोर गुरुवारी असणार आहे.पुणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.पुणे,पुणे घाटमाथा,कोल्हापूर,सातारा,नाशिक या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.
राज्यातील मराठवाडा,विदर्भात अजूनही पाऊस सक्रीय झाला नाही.परंतु ६ जुलैपासून या भागांत पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता. यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधाणार आहे. मुंबई,ठाणे,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत ३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वातावरणात गारवा निर्माण होणार असला,तरी सध्या पावसाचा जोर कमी असल्याने कुठल्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.मात्र,काही निवडक भागांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी,बीड, हिंगोली,नांदेड,लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण मध्यम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.