मराठी माणसाच्या शक्तीसमोर हिंदी सक्ती हरली;
सरकारचा जीआर रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
मुंबई :- पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणसाच्या शक्तीसमोर या सरकारची सक्ती हरली असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. 5 जुलैला आम्ही विरोधाचा मोर्चा काढणार होतो. पण आता 5 जुलै रोजी काय करायचं, मोर्चा काढायचा की सभा घ्यायची याबद्दल सर्वांशी चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, ‘मराठी माणसात विभागणी करायची आणि मराठी अमराठी असं करून अमराठी मतं भाजपकडे खेचायची असा त्यातला भाजपचा छुप अजेंडा होता. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसाने समंजसपणाची भूमिका घेतली. भाषेला विरोध नाही तर सक्तीला विरोध आहे. सक्तीच्या विरोधात आंदोलन असल्याने त्यात फूट पडली नाही. मराठी माणसाची फूट लाभदायक ठरेल असं सरकारला वाटलं होतं. 5 तारखेला मोर्चा होऊ नये, तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. म्हणून त्यांनी तो जीआर रद्द केला. भाजपकडून खोटी माहिती पसरवली जात आहे, अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ते म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण आल्यानंतर आम्ही माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यावर एक अभ्यासगट नेमली. पण त्या अभ्यासगटाची एकही बैठक झाली नाही. मात्र नंतर सरकार पडलं. त्यामुळे भाजपकडून खोटं पसरवलं जात आहे. एखादे संकट आल्यानंतर मराठी माणूस जागा होतो. पण आता आपण जागे झालोय, एकत्र आलोय. आता मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हिंदीचा जीआर मागे घेतला गेला. पण आता मराठी माणसाची ही एकजूट कायम राहावी असं उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदीच्या विरोधात आम्ही 5 जुलैला मोर्चा काढणार होतो. पण तो मोर्चा आता रद्द झाला तरी त्या दिवशी विजयी मोर्चा काढायचा की आणखी काही कार्यक्रम करायचा यावर चर्चा करू. या संदर्भात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्यांशी चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.