इंग्लंडचे गर्वहरण करत भारताचा दुसऱ्या कसोटीत एजबेस्टनवर ऐतिहासिक विजय
बर्मिंगहम :- इंग्लंडचे गर्वहरण करत भारतीय संघाने ब्रिटीशांच्या मैदानात तिरंगा फडकवला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने देदिप्यमान कामगिरीचा नजराणा पेश केला. शुभमन गिलने द्विशतकासह भारताच्या विजयचा पाया रचला होता. भारताच्या गोलंदाजांनी त्यावर कळस चढवला आणि त्यामुळे भारताला हा दुसरा सामना जिंकता आला. भारताने या सामन्यात ३३७ धावा राखत मोठा विजय मिळवला. या सामन्यातील विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. पहिला कसोटी सामना भारताला गमवावा लागला होता. त्यानंतर या सामन्यातील विजयासह युवा भारताने या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी केली आहे.
शुभमन गिलने पहिल्या डावात द्विशतकत झळकावले, तर दुसऱ्या डावात त्याने शतकही पूर्ण केले. त्यामुळे गिलच्या या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी ६०८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने इंग्लंडची चौथ्या दिवशी ३ बाद ७८ अशी अवस्था केली होती. त्यानंतर पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी सात विकेट्सची गरज होती. पण पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला जोरदार पाऊस आला आणि सामना वेळेत सुरु झाला नाही.
पण पावसानंतर भारतीय गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. खासकरुन आकाश दीप त्यावेळी आग ओकत होता. आकाश दीपने एकामागून एक दोन धक्के इंग्लंडला दिले. आकाश दीपने प्रथम ऑली पोपला २४ धावांवर असताना क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर आकाश दीपने अप्रतिम चेंडू टाकत भारताच्या विजयाच्या मार्गात अडसर ठरत असलेल्या हॅरी ब्रुक्सला बाद केलं. यावेळी आकाशने एवढा वेगवान चेंडू टाकला की, आपण बाद झालो, हे हॅरीला समजलंच नाही. त्यांनतर बेन स्टोक्सचा अडसर वॉशिंग्टन सुंदरने दूर केला. पण यावेळी जेमी स्मिथ भारताच्या विजयाच्या मार्गातील मोठा काटा होता. पण आकाश दीपने त्याला ८८ धावांवर बाद केले आणि तिथेच भारतीय संघाचा विजय निश्चित झाला.