सहायक आयुक्त,समाज कल्याण,ठाणे कार्यालयाचे सर्व महाविद्यालयांना निर्देश
ठाणे:- महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टलद्वारे विविध शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. हा पोर्टल आता MahaDBT १.० वरून MahaDBT 2.0 मध्ये परावर्तित (Migration) होत असल्यामुळे सर्व महाविद्यालयांनी सन २०१८-१९ ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत,असे निर्देश समाज कल्याण,ठाणे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिले आहे. सध्या महाविद्यालय स्तरावर एकूण ३१६२ अर्ज प्रलंबित असून,संबंधित महाविद्यालयांनी वेळेत अर्जाची पडताळणी व मंजुरी न केल्यास पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाDBT पोर्टल सन २०१८-१९ पासून कार्यरत असून पात्र विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविणे तसेच कोणताही पात्र विद्यार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी आहे. तरी सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्जाची तात्काळ तपासणी करून मंजुरी / कार्यवाही पूर्ण करावी. या प्रकरणी दिरंगाई झाल्यास संबंधित प्राचार्य व महाविद्यालय प्रशासन जबाबदार राहील,याची गंभीर नोंद घ्यावी,असेही समाज कल्याण,ठाणे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी स्पष्ट केले आहे.