मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाला आहे आणि आज राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहचल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले आहेत. नागरी समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं सांगण्यात येत आहे. राज आणि फडणवीस यांच्यामध्ये अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या चर्चेचे विषय गुलदस्त्यातच आहेत. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पराभवानंतर आणि भाजपा-मनसे यांच्यातील वाढत्या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने नव्या राजकीय समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अलीकडेच जवळीक दाखवली असताना ही भेट कोणाला इशारा देण्यासाठी आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.