कसारा घाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.मध्य रेल्वेने (Central Railway) याबाबत प्राथमिक आराखडा तयार केला आहे. 140 किलोमीटरच्या मार्गावर समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असून सुमारे चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. नवीन रेल्वे लाईनमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होण्याची आशा व्यक्त होत आहे. याबाबत रेल्वे मंत्रालय पुढे काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी या रेल्वे मार्गाबाबत पाठपुरावा केला होता. मनमाड – इगतपुरी दरम्यान नव्याने टाकण्यात येणारी रेल्वे लाईन थेट कसारापर्यंत नेल्यास या मार्गावर लागणाऱ्या वेळेची मोठी बचत होईल. त्यामुळे रेल्वेचा पैसा देखील वाचेल. या पार्श्वभूमीवर त्यांनी तत्कालीन रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे साकडे घातले होते. रावसाहेब दानवे यांनी देखील या रेल्वे मार्गाबाबत सकारात्मकता दर्शवली होती. सद्यस्थितीत रेल्वेला इगतपुरी– कसारा दरम्यान बँकर लावले जातात, तरीदेखील गाडी घाटात थांबत थांबत जाते. या नव्या रेल्वे लाईनमुळे बोगद्यांचा डायमीटर वाढविला जाईल. इगतपुरी – कसारा दरम्यानचा घाट रस्त्यात ही रेल्वे लाईन टाकल्यामुळे वेगाने रेल्वे प्रवास होणे शक्य होणार असून नाशिक – मुंबई दरम्यान लोकल सेवा देखील यामुळे सुरु करण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली होती.
आता कसारा घाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे ट्रॅक टाकला जाणार आहे. 140 किलोमीटरच्या मार्गावर हा समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार आहे. मध्य रेल्वेने याबाबत प्राथमिक आराखडा तयार केल्याची माहिती समोर येत आहे. नवीन मार्गावर न्यू नाशिकरोड, न्यू पाडळी, वैतरणानगर, चिंचलखैरे ही चार नवीन स्थानके तयार होणार आहेत.
तर नवीन मार्गात कसारा घाटासह इतर ठिकाण मिळून 12 बोगदे होणार आहेत. नवीन रेल्वे लाईनमुळे वेळेचे आणि इंधनाची बचत होण्याची याशा व्यक्त होत आहे. नवीन रेल्वे मार्गामुळे दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. आता या नवीन मार्गाबाबत रेल्वे मंत्रालय पुढे काय निर्णय घेणार? ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.