MENU
  • Total Visitor ( 136349 )

मतदान ओळखपत्र नाही; तर काळजी नको, हा पुरावा चालेल

Raju tapal November 02, 2024 173

मतदान ओळखपत्र नाही; तर काळजी नको, हा पुरावा चालेल

मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार मतदानकार्डशिवाय १२ पुरावे

अमरावती दि.२-मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापाञ यांनी दिली आहे.

अमरावती जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी ८ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजीता महापाञ यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करावे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळखपटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत न्यावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

हा पुरावा धरला जाईल ग्राह्य

आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीने विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement