• Total Visitor ( 134333 )

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

Raju tapal February 03, 2025 112

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी;
सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत

मुळशीच्या पैलवानाने राखली घराण्याची परंपरा;
आजोबानंतर नातू पृथ्वीराज मोहोळने जिंकली मानाची गदा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या 67 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले.

अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे.पैलवान पृथ्वीराज मोहळने पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. पैलवान पृथ्वीराज मोहोळने अंतिम फेरीत बाजी मारत ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली आहे.

पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पैलवान पृथ्वीराज मोहळला चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली आहे. पृथ्वीराज मोहळने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला.यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संग्राम जगताप, माऊली खटके, काशिनाथ दाते, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ, शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली?

अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र,या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामन्यात मोठा गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्यामुळे स्पर्धेला गालबोट लागलं.उपांत्य फेरीचा सामन्यात पैलवान शिवराज राक्षेचा पराभव झाल्याचा निर्णय पंचांनी दिला. मात्र, पैलवान शिवराज राक्षेने पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत पंचाला लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला.

पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात उपांत्य फेरीचा कुस्तीचा सामना रंगला होता. मात्र, पैलवान पृथ्वीराज मोहोळकडून शिवराज राक्षे पराभूत झाला. पण पराभूत होताच शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मैदानात काहीवेळ गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद काहीसा निवाळला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. हा गोंधळ झाल्यानंतर शिवराज राक्षेने या सामन्याचा रिव्ह्यू घेण्याची मागणी केली होती.

पृथ्वीराज मोहोळने मुळशी तालुका निवड चाचणीपासूनच कोणत्याही प्रतिस्पर्धी मल्लाला कमी न लेखण्याची खबरदारी घेतली होती. त्यामुळे तालुका स्तरापासून ते जिल्हा व राज्यस्तरावरील महाराष्ट्र केसरीपर्यंतच्या सर्व कुस्त्या त्याने दहा विरु्दध शून्य अशा मोठ्या गुणांच्या फरकाने जिंकलेल्या आहेत. राज्यस्तरावरील महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य सामन्यात मात्र त्याने कमाल करून प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला ढाक या डावावर चितपट केले आहे.

यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेला पृथ्वीराज हा त्याचे आजोबा अमृता मोहोळ यांचा नातू आहे. अमृता मोहोळ यांनीही महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावलेला आहे. आजोबानंतर नातवाने महाराष्ट्र केसरीची गदा मिळविल्यामुळे एकाच घरात दोन महाराष्ट्र केसरीची गदा मिळाल्या आहेत. मुठा गाव हे मामासाहेब मोहोळ यांचे गाव असून मामासाहेबांनी कुस्तीगीर परिषदेची स्थापना केलेली आहे. त्याच मामासाहेबांच्याच गावकी आणि भावकीतील असलेला पृथ्वीराज याने या महाराष्ट्र केसरीच्या गदेवर नाव कोरले आहे.

पृथ्वीराजचे आजोबा अमृता मोहोळ यांनी १०९० साली वर्धा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती सामन्यात सतीश मांडियाचा पराभव करून महाराष्ट्र केसरी किताबाचा मान मिळविलेला आहे. पृथ्वीराजचे वडील राजेंद्र मोहोळ यांना १९९९ साली नागपूर येथे झालेल्या उपांत्य सामन्यात माती विभागात पराभूत व्हावे लागले होते.

पृथ्वीराजचा चुलता सचिन मोहोळ यांनाही गोंदिया येथे झालेल्या उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पृथ्वीराजचा दुसरा चुलता सागर मोहोळ यांना बालेवाडी येथी सामन्यात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी बक्षीस म्हणून दिली जाणारी मानाची चांदीची गदा ही कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाते. पृथ्वीराजचे आजोबा अमृता मोहोळ यांच्यानंतर वडील राजेंद्र तसेच सचिन व सागर या दोन चुलत्यांच्या पराभवाचा सल यावेळी दूर करण्यात पृथ्वीराज मोहोळला यश आले आहे.

स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी पारितोषिकेही मोठी ठेवण्यात आली आहेत. गेले पाच दिवस स्पर्धेच्या भव्य आयोजनाचा आनंद राज्याच्या जनतेला घेता आला. यापुढेदेखील या स्पर्धेचे आयोजन करतांना या स्पर्धेचे दिमाखदार आयोजनाचे आव्हान आयोजकांसमोर असेल. खेळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनदेखील प्रयत्नशील आहे. प्रत्येक खेळाच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करेल आणि अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठीदेखील आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे भव्य आयोजन झाल्याचे नमूद करून केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ही मानाची स्पर्धा आहे. स्व.मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेला सुरूवात केली. त्यानंतर राज्यात कुस्तीच्या वैभवात भर पडून ही परंपरा आणखी पुढे जात आहे. महाराष्ट्र कुस्तीची पंढरी आहे. राज्याने देशाला अनेक मल्ल दिले. महाराष्ट्राच्या तीन मल्लांना शासनाने वर्ग एक दर्जाच्या पदावर नियुक्ती दिली आहे. येत्या काळातही कुस्तीला राजाश्रय मिळेल असा विश्वास व्यक्त करून राज्याची ही परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कुस्ती खेळाला डोपींगसारख्या प्रकाराने गालबोट लागू नये यासाठी येत्या काळात अधिक प्रयत्न होतील असे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे सभापती प्रा.शिंदे यांनी जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला धन्यवाद दिले. कुस्तीप्रेमी जनता चांगल्या खेळालाच प्रोत्साहन देते असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर वासियांसाठी मोठी पर्वणी आहे. वाडिया पार्कचे मोठ्या स्टेडिअममध्ये रुपांतर करायचे आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला चालना मिळेल असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दल संयोजकांचे अभिनंदन करून क्रीडा मंत्री भरणे म्हणाले, 2005 मध्ये अहिल्यानगरमध्ये ‘हिंद केसरी’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. राज्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याने मल्ल दिले आहेत. अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठी शासनाकडून आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविकात आमदार जगताप यांनी कुस्ती स्पर्धेविषयी माहिती दिली. लाल मातीच्या खेळातून संस्कार होत असल्याने राज्यभरात या खेळाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कुस्ती स्पर्धेमुळे अहिल्यानगरचे नाव प्राधान्याने घेतले जाईल असे ते म्हणाले.

माजी आमदार अरुणकाका जगताप, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी खासदार सुजय विखे पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेश दोडके, चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे, जिल्हा कुस्तीगीर कार्याध्यक्ष संघाचे संतोष भुजबळ आदी उपस्थित होते.
 

Share This

titwala-news

Advertisement