दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार
यावर्षी दिवाळी आणि छठ पूजा हंगामात देशभरात १२ हजारांहून अधिक विशेष रेल्वे चालवल्या जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली. याशिवाय, रेल्वेमंत्र्यांनी बिहारसाठी नवीन वंदे भारत आणि चार नवीन अमृत भारत रेल्वे गाड्यांची घोषणाही केली. याचबरोबर त्यांनी सांगितले की, बिहारमधील पूर्णिया ते पाटणा अशी आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू केली जाईल, तर गयाजी ते दिल्ली, सहरसा ते अमृतसर, छपरा ते दिल्ली आणि मुझफ्फरपूर ते हैदराबाद अशी चार नवीन अमृत भारत ट्रेन अनुक्रमे धावतील.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, नवीन धोरणानुसार, या सणासुदीच्या काळात १३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान प्रवास केल्यास त्यांच्या परतीच्या भाड्यात २० टक्के सूट देऊन कन्फर्म तिकीट मिळेल.
आगामी गणेश चतुर्थी, दसरा, दीपावली आणि छठ सणांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, दक्षिण पश्चिम रेल्वेने यशवंतपूर आणि सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू येथून विविध ठिकाणी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवा नियमित गाड्यांमधील गर्दी कमी करण्यास आणि सणांना जाणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवास पर्याय प्रदान करण्यास मदत करतील.