वाचकांमुळेच मिळाली साहित्य लेखनाची प्रेरणा - सचिन बेंडभर
शिरूर:- अर्लीयन कवियों का आध्यात्म प्रायव्हेट लिमिटेड आयोजित थेट प्रक्षेपण या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक सचिन बेंडभर यांची मुलाखत घेण्यात आली. निवेदिका स्वाती सेलोकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत लेखक सचिन बेंडभर यांचा संपूर्ण साहित्य प्रवास उलगडला. या गप्पांमध्ये हास्य,विनोद,वेदना आणि संवेदना या सर्वांचा समावेश होता. त्यामुळे कधी हसू आणि कधी आसू यांचा मेळ साधत गप्पांची मैफिल चांगलीच रंगली. सेलोकर यांनी सचिन बेंडभर यांना एकूण दहा प्रश्न विचारले. "सकाळ "पेपरमध्ये छापून आलेल्या अगदी पहिल्या कथेपासून पाठ्यपुस्तकात कविता समाविष्ट होईपर्यंचा सर्व प्रवास बेंडभर यांनी यावेळी सांगितला. नवोदित लेखक व कवींना प्रेरणादायी ठरेल अशीच ही मुलाखत झाली. यावेळी नवोदित लेखकांनी नेमके काय केले पाहिजे याची दिशा बेंडभर यांनी सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बेंडभर यांनी विविध किस्से सांगत त्यांच्या येते जगाया उभारी, आजोळ आणि तो विजयाचा स्वामी या कवितांचे सादरीकरण केले. उपस्थित श्रोत्यांनी त्यांना टाळ्यांची दाद देत उफुर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रीय ओपन माईक विजेत्या हर्षा भुरे आणि रेश्मा मेहता यांनी देखील यावेळी आपल्या स्पर्धांचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती सेलोकर यांनी सुमधुर आवाजात केले. तर दिपेश रुके यांनी आभार मानले. अगदी पहिल्या कथेपासुन आजपर्यंत वाचकांनी पत्र, फोन, ई मेल, फेसबुक आणि व्हॉट्स अॅप द्वारे साहित्य आवडल्याचे कळवले. याच अभिप्रायांनी मला लिहिते केले. त्यामुळे साहित्य लेखनाची खरी प्रेरणा वाचकांमुळेच मिळाली असे महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर पाटील यांनी टिटवाळा न्यूजला सांगितले.