आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया:कागदपत्र पडताळणी व प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ
ठाणे :- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE) अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेत सोडतद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी व प्रवेश निश्चित करण्यासाठी दि. ३० एप्रिल,२०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. या प्रक्रियेस प्रतिसाद देणाऱ्या पालकांच्या सोयीचा विचार करून तसेच सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी दि. ०१ मे २०२६ ते दि. ०८ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, दिलेल्या कालावधीत पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित शाळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे की,या कालावधीनंतर कोणतीही पुढील मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे सोडत यादीत नाव असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी विलंब न करता तत्काळ आवश्यक कार्यवाही करावी. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे,अर्जाची माहिती व संबंधित शाळांची माहिती अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असून,पालकांनी ती तपासून नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. “आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव प्रवेश ही वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची संधी आहे. कोणताही पात्र विद्यार्थी केवळ कागदपत्र पडताळणी न झाल्यामुळे वंचित राहू नये, यासाठी ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांनी दिलेल्या कालावधीत सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून घ्यावा. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही,” असे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी स्पष्ट केले.