संविधान हे जिवंत दस्तऐवज जतन करणे आवश्यक
संविधान हे जिवंत डॉक्युमेंट( दस्तऐवज) म्हणून सर्वांनीच संविधानाचे जतन करणे आवश्यक
महापालिका आयुक्त अभिनव गोयल
आणीबाणीच्या 50व्या वर्धापन दिनी आयोजिलेल्या संविधान रॅलीत हजारो विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग
संविधान हे जिवंत डॉक्युमेंट( दस्तऐवज) म्हणून सर्वांनीच संविधानाचे जतन करणे आवश्यक असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले, शासनाच्या निर्देशानुसार आणीबाणीच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अत्रे रंगमंदिरातील संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. संविधानाने आपल्याला बऱ्याच प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे, हे स्वातंत्र्य असले तरी काही बंधने आणि सीमा आपण नागरिक म्हणून पाळल्या पाहिजेत, आणीबाणीच्या कालावधीत घडलेल्या घटनांवर चर्चा होवून, संविधानात काही बदल केले गेले. त्यामुळे संविधान अजून मजबुत झाले. त्यामुळे आजच्या ह्या आणीबाणीच्या वर्धापन दिनी, आणीबाणीच्या काळात ज्यांनी लढा दिला, त्यांचे स्मरण करणे हे गरजेचे आहे, असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी आचार्य अत्रे रंगमंदिराच्या तळ मजल्यावर प्रदर्शित करण्यात आलेल्या आणीबाणी विषयक चित्रांच्या प्रदर्शनाचे आणि डिजीटल स्टॅन्डीवरील माहितीपर छायाचित्रांचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
आणीबाणीचा वर्धापन दिन म्हणजे संविधानाबाबतची आस्था, लोकशाहीचा जागर आणि राष्ट्राबाबतचे प्रखर प्रेम दर्शविण्याचा दिवस होय, असे उद्गार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी यावेळी आपल्या भाषणात काढले.
या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते, संविधानाचे अभ्यासक माधव जोशी यांनी संविधानाने दिलेले हक्क आणि आपली कर्तव्ये याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आणीबाणीचा कालावधी हा एक काळा कालखंड आहे,आणीबाणीच्या लढ्यामध्ये कल्याण-डोंबिवलीमधील काही नागरिकांनी देखील हिरीहिरीने सहभाग घेतला होता. आपली राजवट ही, प्रजासत्ताक राजवट आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे आपण सार्वभौम आहोत. स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या व्यक्तींचा सन्मान करणे आवश्यक आहे, असे उद्गगार त्यांनी आपल्या भाषणात काढले.
यावेळी सकाळच्या समयी काढण्यात आलेल्या संविधान जनजागृती रॅलीमध्ये महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे समवेत महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपआयुक्त तथा या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संजय जाधव, उपआयुक्त रमेश मिसाळ, समीर भुमकर, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, महापालिका सचिव किशोर शेळके तसेच महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी आणि महापालिका क्षेत्रातील शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
आणीबाणीच्या 50व्या वर्धापन दिनी महापालिका परिक्षेत्रातील शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थी व विद्यार्थींनींनी केलेल्या मनमोहक, चित्तवेधक देशभक्तीपर नृत्याच्या सादरीकरणाने आणि देशभक्तीपर सुरेल गीत गायनाने तसेच महापालिकेतील दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीताने अत्रे रंगमंदिराचे सभागृह देशप्रेमाने भारुन गेले होते. अत्यंत सुंदर अशा सादरीकरणामुळे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
या कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य लेखा परिक्षक लक्ष्मण पाटील, उपआयुक्त तथा या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संजय जाधव, उपआयुक्त रमेश मिसाळ, समिर भुमकर, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, जगदीश कोरे, रोहिणी लोकरे, शैलेश कुलकर्णी, शैलेश मळेकर, अशोक घोडे व्यासपिठावर उपस्थित होते. व्यासपिठावर उपस्थितांचे संविधानाची उद्देशिका देवून स्वागत करण्यात आले.