सातारा जिल्यात प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात
राजू टपाल.
टिटवाळा :- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील 'बगाड यात्रा' ही महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध, ऐतिहासिक आणि शौर्याची प्रतीक मानली जाणारी परंपरा आहे. या यात्रेला सुमारे ८०० वर्षांचा इतिहास असून ती दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी यात्रेमध्ये रविवारी रंगपंचमीच्या दिवशी मुख्य बगाड यात्रेला सुरुवात झाली असून बगाड्याचा मान विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला आहे. होळी पौर्णिमेच्या मध्यरात्री श्री काळभैरवनाथ मंदिरात देवाला कौल लावून 'बगाड्या'ची निवड केली जाते. बगाड म्हणजे एका मोठ्या लाकडी गाडीवर उभा केलेला सुमारे ५० फूट उंच लाकडी खांब (शीड). या खांबाच्या टोकाला एका लोखंडी आकड्याद्वारे मानकरी (बगाड्या) टांगला जातो. या यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बगाड ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या देखण्या आणि धष्टपुष्ट खिलार बैलजोड्या. साधारणपणे १० ते १२ जोड्यांच्या साहाय्याने हे बगाड नदीवरून गावाकडे ओढून आणले जाते. हे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ आणि जोगूबाई यांचा विवाह सोहळा मानला जातो. यात्रेपूर्वी 'पाकळणी' (मंदिर स्वच्छता) आणि हळदीचे कार्यक्रम पार पडतात. ज्या भाविकाची बगाड्या म्हणून निवड होते, त्याला पाच दिवस कडक उपवास करावा लागतो. या काळात तो केवळ कडुलिंबाचा पाला खाऊन आणि मंदिरात राहून देवाची सेवा करतो. या यात्रेत गावातील सर्व बारा बलुतेदार आणि जाती-धर्माचे लोक एकत्र येतात. शेतकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, ज्याच्या शेतातून हे बगाड जाते, तिथे त्या वर्षी उत्तम पीक येते. या दिवशी तिथे "काशिनाथाचं चांगभलं!" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो.