हाय सेक्युरिटी नंबर प्लेट हवीच कशासाठी? मनसे आक्रमक
राज्य परिवहन विभागाकडून सर्व प्रकारच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स (एचएसएनपी) बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र या नव्या नंबर प्लेट विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. उच्च सुरक्षा पाट्या वाहनांसाठी नक्की कशासाठी हव्यात? असा सवाल केला आहे. या पाट्या बसवल्या तर वाहन चोऱ्या थांबणार आहेत का असा सवाल मनसेने केला आहे. या संदर्भात मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत विरोध दर्शवला आहे.
परिवहन विभागाकडून वाहनावर या प्लेट बसवण्यासाठी ३१ मार्च २०२५ अंतिम तारीख दिली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे वाहनांचे “आधार कार्ड” म्हणजेच “उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी” सर्व वाहनांसाठी बसवण्याचे आदेश दिले आहेत. यावर बोलताना मनसेने असे म्हटले आहे की, कोणी तरी उठतो न्यायालयात जातो आणि न्यायालय कायदेशीर निकषावर आधारित निर्णय घेऊन मोकळे होतो पण अशा निर्णयाची व्यवहार्यता तपासणे ही तितकीच गरजेची आहे असे का वाटत नाही? असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान . १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर HSRP या नंबर प्लेट नाहीत. त्या वाहनांसाठी HSRP बसवण्याचे आदेश आहेत. मात्र या हाय सेक्युरिटी नंबर प्लेट विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी असे म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड देणारा आणि त्याची काही चूक नसताना दंडरुपी खंडणी देण्यास भाग पडणारा हा निर्णय आहे, असा हल्लाबोल मनसेने चढवला आहे.