देशसेवेची हमी देणारी योजना म्हणजेच अग्निवीर योजना; निवृत्त एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य यांचे प्रतिपादन
संरक्षण दलातील करिअर संधी या विषयावर तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात विशेष व्याख्यान
विजय ढमढेरे
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- देशसेवेबरोबरच भविष्याची हमी देणारी योजना म्हणजेच अग्नीवीर योजना असल्याचे प्रतिपादन भारतीय वायुसेनेचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य यांनी केले.
तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या "भारतीय संरक्षण दलातील करिअर संधी "या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात निवृत्त एअर व्हाईस मार्शल वैद्य बोलत होते.
शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.
एअरमार्शल वैद्य पुढे म्हणाले की, युवाशक्ती हे आपल्या देशाचे बलस्थान आहे. संरक्षण सिद्धता आणि व्यावसायिक दृष्टिकोन ही आपल्या देशाची आवश्यकता आहे. या परिस्थितीत तरुणांची कणखर मानसिकता आणि देशाप्रती असलेला आदर हेच आजच्या हिंदुस्थानची गरज असल्याचे वैद्य म्हणाले. भारतीय संरक्षण दलाने अमलात आणलेल्या अग्निवीर योजनेत वय वर्षे १७ ते २१ वयोगटातील जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होऊन देशसेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात महेशबापू ढमढेरे म्हणाले की, आपली भारतमाता हीच आपल्या जीवनातील प्रत्येकाचा प्राधान्याचा विषय असायला हवा. देशप्रेम आणि त्याग आजच्या युवापिढीने अंगीकारणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून आपल्या देशाने शत्रुराष्ट्राला शिकविलेला धडा आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी असल्याचे महेशबापू ढमढेरे यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.