• Total Visitor ( 430421 )

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

Raju tapal September 17, 2025 56

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी



राजापुरातील देवाचेगोठणे,दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी



मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना



कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा;



तर रोजगाराच्याही संधी होणार उपलब्ध



रत्नागिरी :- मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार ना. नितेश राणे यांच्याकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटन वाढ या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी व त्यांना अधिक चालना देण्यासाठी राज्य शासनाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील २ व सिंधुदुर्ग मधील १ अशा तीन ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच राज्याच्या महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाकडून सीआरझेड विषयी देखील मंजुरी देण्यात आली आहे.



राज्य शासनाने मंजूर केलेल्या तीन जेटीं मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी, दापोली तालुक्यातील उटंबर  तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर याठिकाणी नव्या जेटी उभारण्यात येणार आहे. कोकणात मासेमारी बरोबर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकर वाडा बंदराचा विकास करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या या तिन्ही जेटींचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहेत.



ना. नितेश राणे यांनी खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. मत्स्य व्यवसायाला त्यांनी जल पर्यटनाची जोड दिली आहे. किनारपट्टीवर सोयी सुविधा बळकट केल्या तर त्याचा फायदा होईल हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकणच्या किनारपट्टीवर नव्याने जेटी उभ्या राहिल्यास कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. मासेमारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटी अत्यंत महत्त्वाच्या असून या जेटीमुळे मासेमारी नौका, प्रवासी बोटी आणि रो-रो जहाजे यांना सुरक्षित थांबा मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तसेच मालाची वाहतूक अधिक सोयीस्कर करता येणार आहे.



या तीन नव्या जेटींमुळे कोकणातील किनारपट्टीवरील पर्यटन वृद्धी होणार असून पर्यटनातून आर्थिक विकास होण्यास चालना मिळणार आहे.यातूनच स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या जेटींच्या माध्यमातून कोकण आणि मुंबई पुन्हा एकदा सागरी मार्गाने जोडले जावून यामुळे प्रवास खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होणार आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement