अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध
मात्र येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण
राजू टपाल.
मोहने :- मोहने येथील एन.आर.सी. कारखान्याच्या जागेवर अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट ग्राइंडिंग युनिट सुरू करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना, शेतकरी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी प्रखर विरोध दर्शविला. मात्र येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय मंडळी आपली पोळी भाजून कशी घेता येईल हे ही सोयीस्कर रित्या गणित जुळवीत असल्याचे या निमित्ताने दिसून आले.
अदानी समूहाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितल्यानंतर 12 सप्टेंबर रोजी हजारो नागरिकांनी कल्याण येथे जाऊन या प्रकल्पाविरोधात हरकती दाखल केल्या होत्या. त्यानंतर हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी MPCB तर्फे 16 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुनावणीचे आयोजन करण्यात आले. या सुनावणी दरम्यान नागरिकांनी, स्थानिक भूमिपुत्रांनी तसेच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमुखी विरोध नोंदवला. तसेच अधिकाऱ्यांसमोर प्रकल्पाला विरोध असल्याचे एकमुखी जाहीर केले.
सुनावणीला उपस्थित नागरिकांनी या प्रकल्पामुळे परिसरात होणाऱ्या प्रदूषणाचा, आरोग्य व शेतीवर होणाऱ्या दुष्परिणामांचा मुद्दा अधिकाऱ्यांसमोर ठामपणे मांडला. तर काही नागरिकांनी आमचे देणे कधी मिळणार असा सवाल उपस्थित करीत स्थानिकांना या प्रकल्पात नोकऱ्या मिळाव्यात असा आशावाद व्यक्त केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्याम दादा गायकवाड यांनी अदानी समूहाच्या प्रकल्पासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र कंपनीच्या प्रतिनिधींना त्यांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
या सुनावणीला परिसरातील अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यात महेंद्र गायकवाड, दया शेट्टी, मयूर पाटील, सुनंदा मुकुंद कोट यांचा समावेश होता. ग्रामस्थ मंडळ मोहन्याचे अध्यक्ष सुभाष पाटील, शिवसेनेचे अंकुश दादा जोगदंड, अटाळी-आंबिवली गावचे भूमिपुत्र दशरथ पाटील, मारुती पाटील,रमन तरे यांनीही जोरदार आक्षेप नोंदविला.
काँग्रेस मोहणे ब्लॉक अध्यक्ष व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे.सी. कटारिया,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा शहराध्यक्ष दिनेश जाधव, शहर सेक्रेटरी आनंद जाधव,दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड सोनवणे, सोशल मीडिया प्रतिनिधी योगेश जाधव, उंभरणी गावचे नाना पवार, सुधीर कटारनवरे व सुशील आर.के. यांनी देखील प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली.
स्थानिक रहिवाशांनी एकमुखीपणे मांडले की, "हा प्रकल्प राबविण्यात आला तर परिसरातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होईल आणि गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे हा प्रकल्प रद्द केला जावा अशी उपस्थित नागरिकांनी जोरदार मागणी केली. दरम्यान सदरील निषेधाच्या आडून काही राजकीय लोकप्रतिनिधी आपली पोळी भाजून घेण्यासाठी सरसावली असल्याचे या निमित्ताने दिसून येत होते. अदानी ने जर प्रकल्प चालू केला तर आपल्याला कामे कशी मिळतील. आपल्या मर्जीतील लोकांना कामाला कसे लावता येईल या बरोबरच अदानी कंपनीकडून आपला काही वैक्तिक फायदा कसा होईल याचाही विचार करून ह्या निषेध सभेला स्थानिक नागरिकांना हाताशी धरून आंदोलन करीत असल्याची चर्चा येथे रंगली होती.
दरम्यान अदानी येथील सिमेंट प्रोजेक्ट गुंडाळेल की राजकीय पक्षातील म्होरक्याना आपल्या हाताशी धरून सदरील प्रकल्प पूर्ण करील या बाबाबत उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या होत्या.