एकीकडे पाकिस्तान आणि भारतात तणाव वाढलेला असतानाच इकडे उत्तर भारतात एक मोठी दुर्घटना घडली आहे. चार धाम यात्रे दरम्यान ही घटना घडल्याने अनेक भाविकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
चारधाम यात्रेला गोलबोट लागले आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात आज सकाळी एक हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. या अपघातात 6 लोकांचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यात मुंबईमधील चार भाविक असल्याची माहिती समोर येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.
गंगनानी भागात कोसळले हेलिकॉप्टर
गुरुवारी सकाळी जवळपास 9 वाजेच्या दरम्यान गंगोत्री राष्ट्रीय राजमार्गाजवळ गंगनानी या भागात हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ, अग्निशमन दल, मेडिकल आणि इतर मदत आणि पूनर्वसन दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. येथे बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरू आहे.
मुंबईचे चार भाविक ठार
हे हेलिकॉप्टर एअरटांस कंपनीचे होते. सकाळीच सहस्त्रधारा हेलिपॅड येथून त्याने उड्डाण केले. हर्षिलसाठी हेलिकॉप्टर निघाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण 7 लोक प्रवास करत होते. त्यात सहा यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला. या यात्रेकरूंमध्ये चार मुंबईतील आणि दोन आंध्र प्रदेशातील होते, अशी माहिती समोर येत आहे.
हवामानाबाबत इशारा
उत्तराखंडात सध्या चारधाम यात्रा सुरू आहे. केदारनाथ, बद्रिनाथ आणि गंगोत्री-यमुनोत्री जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. काही यात्रेकरू हे पायी प्रवास करत आहेत. तर काही जण हेलिकॉप्टरची मदत घेत आहेत. उत्तराखंडमध्ये आज हवामानाविषयी मोठा इशारा देण्यात आला आहे. डेहराडून, उत्तरकाशी, चमोली, रूद्रप्रयाग, टिहरी, पौडी, नैनीताल आणि चंपावतमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अनेक भागात वीज पडण्याची आणि जोरदार हवा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या सोमवारी 5 मे रोजी बद्रिनाथ धाम क्षेत्रात हवामान खराब झाले होते. त्यावेळी काही यात्रेकरू बद्रिनाथ ते डेहराडून या दरम्यान हेलिकॉप्टरने जात होते. त्यांना गोपेश्वर खेळ मैदानात आपत्कालीन परिस्थितीत उतरवून घेण्यात आले. हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. याठिकाणी काही मिनिटं थांबल्यानंतर हे हेलिकॉप्टर डेहराडूनसाठी रवाना करण्यात आले होते.