बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीची मागणी
शिरूर:-बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी कोरेगाव मूळ ता.हवेली ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे केली आहे. खासदार अमोल कोल्हे,आमदार माऊली आबा कटके तसेच वानवडी,पुणे वनपरिक्षेत्र अधिका-यांना याबाबतचे निवेदन कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीने दिले आहे. निवेदनात असे म्हटले आहे,मौजे कोरेगाव मूळ ता.हवेली जि.पुणे येथे बिबट्या या वन्यप्राण्याने गावामध्ये पशूधनावर हल्ले करून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याचे सत्र चालू आहे. सदर प्रकरणी आपले अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी येवून पंचनामे करतात. परंतु सदर नुकसानीचा मोबदला शेतक-यांना लवकर मिळत नाही. या परिसरातून बिबट्या दुस-या ठिकाणी जाण्याचे नाव घेत नाही. सदर बिबट्याचा वावर २ महिन्यांपासून कड वस्ती,भिडे वस्ती,दासवेवस्ती,शितोळे वस्ती इतर परिसरात आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी काय करावे हे कळत नाही. तरी आपणाकडून योग्य ती उपाययोजना करावी. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी लवकरात लवकर तातडीने पिंजरा लावण्यात यावा. याबाबत वनपरिक्षेत्र अधिका-यांना कळविणेत आले आहे. तरी संबंधित विभागाला आपणाकडून आदेश द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.