मामाच्या गावी जाणा-या भावा बहिणीचा अपघाती मृत्यू ; वसमतजवळील टाकळगाव येथील घटना
दिवाळी सणात मामाच्या गावी जाणा-या भावा बहिणीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली.
विरेगाव येथील अरविंद सुर्य यांची दोन मुले आदर्श सूर्य वय ९ वर्षे, किर्ती सूर्य वय ८ वर्षे मामा राजू खिलारे यांच्यासोबत मामाच्या गावी जात असताना वसमत ते निळा या मार्गावरील टाकळगाव जवळ अचानक समोरून एम एच २२ ए ए १६२० या क्रमांकाच्या टाटा मॅजिकला जोरात धडक दिली. या धडकेत बहिण भावाचा जागीच मृत्यू झाला.
राजू खिलारे वय २४ हे या अपघातात गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वसमत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत टाटा मॅजिक चालकाला ताब्यात घेतले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमत उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. राजू खिलारे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.
राजू खिलारे हा त्यांच्या भाचा भाचीला महिपाल पिंपरी या गावी घेवून जाण्यासाठी आला होता.
या घटनेमुळे महिपाल पिंपरी व विरेगाव या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली.
वसमत पोलीसांत या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.