नारायण राणेंनी मर्डर केले
राणेंच्या मुलासमोरच भरत गोगावलेंनी केले वादग्रस्त वक्तव्य
नितेश राणे मंत्री भरत गोगावलेंवर चांगलेच भडकले
सिंधुदुर्ग :- शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्य सध्या वादाचा विषय ठरत आहे. नारायण राणे हे असेच मोठे झाले नाहीत. त्यांनी त्यासाठी मर्डरही केले आहेत.असं वादग्रस्त वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य राणेंच्या सिंधुदुर्गात येऊन केलं आहे. यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.त्यात पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांना आयतं कोलीत हातात मिळालं आहे. या वक्तव्यानंतर मंत्री नितेश राणे यांनीही गोगावले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
भरत गोगावलेंचे ते भाषण आपण ऐकले नाही असं नितेश राणे म्हणाले. पण ते जे काही बोलले त्यावर त्यांनी प्रतिक्रीय मात्र नक्की दिली आहे. नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री राहीले आहेत. त्यांच्यावर कुठल्या ही पोलिस स्थानकात मर्डरची केस नाही. त्यामुळे गोगावले असं का म्हणाले माहित नाही. पण ते मला कॅबिनेट बैठकीत भेटणार आहेत. त्यावेळी ते माझ्या खांद्याला खांदा लावून उभे असतील. त्यावेळी त्यांच्या ज्ञानात आपण अधिक भर टाकू. त्यांना कदाचित पूर्ण माहिती नसेल असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.
महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. रायगडमधील पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी ते अजूनही प्रयत्नशील आहेत.पालकमंत्रिपदासाठी त्यांनी अघोरी पुजा केली होती, असे आरोप झाले आहेत.हा वाद शांत होण्यापूर्वीच भरत गोगावलेंनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
नारायण राणे यांच्याबद्दल गोगावले काय म्हणाले?
माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंबाबत भरत गोगावले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. त्यांनी अंगावर केलेले घेतल्या. मारामारी केली. मर्डरही केले, सगळं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, असं धक्कादायक वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे.विशेष म्हणजे नारायण राणेच्या मतदारसंघाचे खासदार आहेत त्याच सिंधुदुर्गमध्ये गोगावले यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी हे वक्तव्य करत असताना नारायण राणेंचे पुत्र आणि आमदार निलेश राणे देखील उपस्थिक होते. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही सगळं जुळवून चालायचं. आम्हाला पण जुळवून घ्यावं लागतं हा आमचा सल्ला आहे, असंही सांगायला गोगावले यावेळी विसरले नाहीत.
गोगावलेंची वादग्रस्त कारकिर्द
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी घरामध्ये अघोरी पूजा केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ठाकरे गटानंतर आता महायुतीमधील शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही भरत गोगावले यांचा नवीन व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून भरत गोगावलेंनी घरात अघोरी पूजा केल्याचा दावा त्यांनी केला होता.
बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री... असं सूरज चव्हाण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. म्हणजेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी भरत गोगावलेंनी ही अघोरी पूजा केली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीने केला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार कलगीतुरा सुरु आहे. त्यातच गोगावले यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावरून राणेंना फटकारले आहे. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री होतं. ते पंतप्रधानांच्या बाजूला बसतात. अशा स्थितीत पंतप्रधानांच्या सुरक्षेला ही धोका निर्माण झाला आहे. राज्याचा एक जबाबदार मंत्री, माजी केंद्रीय मंत्र्याबद्दल बोलतो अशा स्थितीत त्याची चौकशी झाली पाहीजे. गृहमंत्र्यांनी त्यांची चौकशी करणे गजरेचे आहे. सध्या मुख्यमंत्री हतबल आहेत का? असा प्रश्नही या निमित्ताने दानवे यांनी केला आहे.
तर राणेंचे कट्टर विरोधत असलेल्या वैभव नाईक यांनीही ही संधी सोडलेली नाही. भरत गोगावले जे काही बोलले ते योग्य आणि खरं बोलले. मी त्यांच्या बरोबर काम केलं आहे. त्यामुळे गोगावलेंच्या मनात एक आणि ओठात एक असं नाही. जे त्यांच्या मनात आहे तेच ते बोलतात असं नाईक म्हणाले. त्यामुळे राणेंचा इतिहास काय आहे हे सर्वांनाच माहित आहे. पण आता गोगावले बोलल्याने हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गोगावले हे राज्याचे जबाबदार मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्व असल्याचं ही ते म्हणाले.