पाण्याखाली जाणा-या धोकादायक पुलाची उंची वाढविण्याची कालठण ग्रामस्थांची मागणी
पाण्याखाली जाणा-या धोकादायक पुलाची उंची वाढवून पुलास संरक्षक कठडे उभारावेत अशी मागणी इंदापूर तालुक्यातील कालठण ग्रामस्थांनी केली आहे.
पुणे -सोलापूर महामार्गापासून ४०० मीटर अंतरावर कालठण येथे जाणा-या रस्त्यावर गेली ५० वर्षांपासून पुल धोकादायक असून कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील कालठण नंबर १ गटातील ऊस वाहतूक करताना नेहमी अपघात होत असतात.
उजनी धरण पूर्ण क्षमतेने १२१ टी एम सी पाण्याने भरल्यानंतर धरण फुगवटा वाढत असल्याने हा पूल पाण्याखाली जातो. या परिसरात मोठा पाऊस पडल्यानंतर ही पूल पाण्याखाली जात़ो. त्यामुळे कालठण नंबर १ , करेवाडी तसेच परिसरातील इतर गावांच्या दळवळणास बाधा होते. या परिसरात किमान दोन हजार एकरवर ऊसाची लागवड असून ऊस कारखान्याकडे नेताना पूल अरूंद असल्याने अडचणी निर्माण होतात .ऊस वाहतूक करणा-या बैलगाड्यांचा येथे अपघात होवून काहींचा मृत्यू झाला.काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढविण्यासाठी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे , माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, पंचायत समिती सदस्या पुष्पाताई रेडके, बाळासाहेब काळे तसेच सर्व पक्षांनी प्रयत्न करावेत अशी मागणी कालठण ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ते वरकुटे बुद्रूक , कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
तीन ते पाच महिन्यापूर्वी केलेले रस्ते उखडू लागल्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. वरकुटे बुद्रूक रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण केलेले आहे. या रस्त्यावरील डांबर जाऊन रस्त्यावर खड्डे पडत आहेत. खड्डे चुकविताना वाहने घसरून अपघातास निमंत्रण मिळत आहे. रस्ता करून तीन ते पाच महिन्यात रस्त्याची दुरवस्था होत असेल तर त्यास जबाबदार कोण ? अशी चर्था नागरिक ,प्रवासी, शेतकरी, वाहनचालकांमध्ये केली जात आहे.