राजापुरात बिबट्याचा हल्यात निवासी नायब तहसीलदार सौ.दीपाली पंडित या महिला जखमी;दुचकीचाही केला पाठलाग
राजापूर :-कोकणात बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या निवासी नायब तहसीलदार महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने मोठी घबराट निर्माण झाली आहे. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे.
राजापूरच्या नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडित या मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारस राजापूर पंचायत समितीच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या. त्या राजापूर पोलिस लाइन पासून काही मीटर अंतरावर असणाऱ्या भारत बेकरीच्या भट्टीजवळ आल्या असता तेथील गडग्यावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.बिबट्या हल्ला करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या हातावर बिबट्याने पंजा मारला असून दुचाकीवरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. परंतु सुदैवाने या हल्ल्यातून त्या बालंबाल बचावल्या आहेत.
दरम्यान त्या रस्त्यात पडल्याचे याच मार्गाने जाणाऱ्या काही पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. राज्यात अलिकडे बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. यामध्ये दुर्दैवाने काहींचे बळीही गेले आहेत. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वीही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता चक्क राजापूर शहरात निवासी नायब तहसीलदारांवरच बिबट्याने हल्ला केल्याने या बिबट्याची राजापूर शहर परिसरात मोठी दहशत पसरली आहे.
खरं तर येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी या भागात बिबट्या फिरत असल्याची तक्रार केली होती, मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याने आज बिबट्याच्या हल्यात राजापूरच्या नायब तहसिलदारच जखमी झाल्या आहेत.