शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे उत्साहात साजरा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन लोकाभिमुख प्रशासन उभारूया मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव
ठाणे :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे आज,दि. ०६ जून,२०२६ रोजी शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम,दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी प्रशासनाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्य,स्वाभिमान,लोककल्याण आणि सुशासनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ राज्यभर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद ठाणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर मानाची स्वराज्य गुढी उभारून तिचे पूजन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. शिक्षक रविंद्र तरे आणि सहशिक्षक यांनी पोवाडा गायन केले तसेच “जय भवानी,जय शिवाजी” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमादरम्यान शिवचरित्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले,“छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याण,न्याय,पारदर्शकता आणि सुशासन यांचे जे आदर्श निर्माण केले,ते आजही प्रशासनासाठी प्रेरणादायी आहेत. सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी राज्यकारभाराची संकल्पना महाराजांनी प्रत्यक्षात उतरविली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ ऐतिहासिक स्मृतीदिन नसून सुशासन,कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा दिवस आहे.” यावेळी त्यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या कार्यातून समाजहित साध्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर,कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग) पद्माकर लहाने, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन,समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे,कार्यक्रम अधिकारी शोभा शेलार,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांच्यासह सर्व विभागप्रमुख,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सूर्यवंशी यांनी केले. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श जीवनात आणि प्रशासकीय कामकाजात अंगीकारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.