वाचन संस्कृती रुजवण्यासाठी दिवाळी अंकांची महत्त्वाची भूमिका
शिक्रापूर (प्रतिनिधी):- दिवाळी अंकाची आपली खूप जुनी व मोठी परंपरा आहे. शरीराच्या स्वास्थ्यासाठी दिवाळी फराळ आवश्यक आहे तसा मनाच्या स्वास्थ्यासाठी दिवाळीचा साहित्यिक फराळही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे दिवाळी अंक वाचले पाहिजेत. त्यातून ज्ञान आणि मनोरंजनही होते.आपली वाचन संस्कृती वृद्धिगत करण्यासाठी दिवाळी अंकांची महत्त्वाची भूमिका आहे,असे मत पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी अक्षरधारा आणि बुकगंगा येथील प्रदर्शनाला भेट दिल्यावर व्यक्त केले.दरवर्षी दसरा संपल्यावर चाहूल लागते ती म्हणजे दिवाळीची.साधारणतः दसऱ्यानंतर दिवाळी अंक यायला सुरुवात होते. दिवाळी अंकाचा वाचक वर्ग खूप मोठा आहे. प्रत्येक अंकाचे वेगवेगळे विषय असतात. मग चोखंदळ वाचक वर्ग आपल्या आवडीप्रमाणे दिवाळी अंकांची खरेदी करतात. यात विनोदी,सामाजिक,शृंगारिक,अनुवादित,गुढ,रहस्यमय,शैक्षणिक आणि पर्यटन अशा वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळी अंक वाचकांचे लक्ष वेधतात. काही दिवाळी अंक तर विशिष्ट विषय घेऊन बाजारात येतात. यावर्षी प्रकाशिका सुनिताराजे पवार यांचा संस्कृती दिवाळी अंक स्री चळवळीची पन्नास वर्ष,संपादक धोंडप्पा नंदे यांचा गावगाथा हा दिवाळी अंक आठवणीतला गाव,संपादिका मयुरी भवारी यांचा पुस्तक मैत्री हा दिवाळी अंक पुस्तक,गणगोत हा दिवाळी अंक रेल्वे,छावा हा दिवाळी अंक अवकाश विज्ञान,तर अक्षरदान हा दिवाळी अंक हरलेली निवडणूक अशा प्रकारचे वेगवेगळे विषय घेऊन रसिक वाचकांच्या भेटीला आले आहेत. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे हे वाचन चळवळीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे,असे मत बेंडभर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.सामना,जत्रा,संस्कृती,फिरकी,शुभम,हास्य धमाल,महाराष्ट्राची जत्रा,धमाल धमाका,शब्दकुसुम,दिवाळी आवाज,शब्द शिवार,सुभाषित,धुळपेरणी,झुंज,गावगाथा,निहार,अपेक्षा,व्यासपीठ,पुस्तक मैत्री,वर्ल्ड सामना,छोट्यांचा आवाज,गोंदण,सर्वोत्तम,खतरनाक,फुलपाखरू,पुरुष स्पंदन,हा हा हा,चौफेर साक्षीदार,शिक्षण संजीवनी,हास्यानंद,शिवारबा,युगप्रवर्तक आणि प्रसाद हे अंक विशेष वाचनीय आहेत असेही ते यावेळी म्हणाले.