कल्याण-डोंबिवलीचा पारा तब्बल ४३°C पार
आंतरिक कोकणासह राज्यात उष्णतेची तीव्र लाट उसळली असून तिचे परिणाम मुंबई महानगर प्रदेशातही (MMR) जाणवले. कल्याण-डोंबिवली परिसरात तापमानाने तब्बल ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने हंगामातील सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद झाल्याची माहिती कोकण हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. त्याचबरोबर आंतरिक कोकणातील अनेक भागांत २०२६ च्या हंगामात प्रथमच तापमान ४५°C च्या पुढे गेले असून घाटमाथ्यालगतच्या भागात ही नोंद झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एमएमआर रिजन (MMR) परिसरातील अंबरनाथ (४३.८°C),मनोर (४३.७°C),तळोजा (४३.४°C),कल्याण (४३.३°C),मोरबे (४३.२°C),बदलापूर (४३.१°C) आणि डोंबिवली (४३°C) येथे उष्णतेची तीव्रता जाणवली. याशिवाय खारघर (४२.९°C),दिघा (४२.७°C),ऐरोली (४२.५°C),कळवा-दिवा (४२.१°C),ठाणे (४१.७°C),पनवेल (४१.५°C), मुलुंड (४१.३°C),कोपरखैराणे (४१.२°C),कांजूरमार्ग (४०.६°C) आणि नवी मुंबई विमानतळ (४०°C) येथेही तापमान ४० अंशांपुढे गेले. “आंतरिक कोकणातील उष्णतेची तीव्रता विदर्भासारखीच असूनही ती अनेकदा अधिकृत नोंदींमध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित होत नाही,” असे स्पष्ट मत अभिजीत मोडक यांनी व्यक्त केले.