• Total Visitor ( 430986 )
News photo

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उद्या ९ सप्टेंबर रोजी

Raju tapal September 09, 2025 71

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उद्या ९ सप्टेंबर रोजी



नवी दिल्ली :- उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उद्या ९ सप्टेंबर रोजी होत आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे खासदार मतदान करतील. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे.त्यांच्यासमोर इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांचं आव्हान आहे.



क्रॉस व्होटिंगचा धोका कोणाला?



उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे मतदान करतात. त्यासाठी कोणताही व्हिप नसतो. खासदार त्यांच्या सदसदविवेकबुद्धीनुसार मतदान करु शकतात. पण बहुतांश खासदार त्यांच्या पक्षाच्या भूमिकेप्रमाणेच मतदान करतात. मात्र तरीही क्रॉस व्होटिंगची शक्यता असते. त्यामुळे अंतिम निकालाबद्दल अंदाज लावणं कठीण असतं.



जिंकण्यासाठी बहुमताचा आकडा काय?



सध्याच्या घडीला लोकसभेत ५४२ आणि राज्यसभेत २३९ खासदार आहेत. याचा अर्थ संसदेत सध्या ७८१ खासदार आहेत. याचा अर्थ जिंकण्यासाठी ३९१ खासदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती मतदानापासून दूर राहणार नाही. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत ७७० खासदार मतदान करु शकतात. याचा अर्थ एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना विजयासाठी ३८६ खासदारांची मतं मिळवावी लागतील.



राधाकृष्णन यांचं पारडं जड, विजय निश्चित



दोन्ही सभागृहात मिळून भाजप प्रणित एनडीएकडे ४२५ खासदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसनं राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संसदेत त्यांचे ११ खासदार आहेत. याचा अर्थ एनडीएचं संख्याबळ ४३६ पर्यंत जातं. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. नवीन पटनायक,चंद्रशेखर राव आणि जगन मोहन रेड्डी या ३ माजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका एनडीएच्या पथ्थ्यावर पडणार आहे.



लोकसभेत ७ अपक्ष खासदार आहेत. त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. आम आदमी पक्षाच्या स्वाती मालिवाल यांची भूमिका काय असणार, हेदेखील अस्पष्ट आहे. कारण त्या पक्षापासून दूर गेल्या आहेत. त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चाही मध्यंतरी सुरु होती. शिरोमणी अकाली दल आणि मिझोरममधील झेडपीएम यांचीही भूमिका स्पष्ट नाही. त्यांच्याकडे प्रत्येकी एक खासदार आहे.



विरोधकांचा मार्ग अवघड



इंडिया आघाडीचे उमेदवार असलेल्या सुदर्शन रेड्डी यांची वाट बिकट आहे. इंडिया आघाडीकडे ३२४ खासदार आहेत. एनडीए ४३६ आणि इंडिया आघाडी ३२४ अशी सध्याची स्थिती आहे. म्हणजे ११२ मतांचं अंतर आहे. सात अपक्ष, अकाली दल, झेडपीएम, मालिवाल यांच्या मतांची गोळाबेरीज करुनही सुदर्शन जादुई आकड्यापासून खूप दूर आहेत. त्यामुळे आता त्यांची मदार क्रॉस व्होटिंगवर असेल.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement