संतांशिवाय प्राप्ती नाही; ह.भ.प.गौरवमहाराज खेडकर
विजय ढमढेरे
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- संतांना शरण गेलं तर संत आपल्या मनातील इच्छा प्राप्त करतात. जर तुमच्याकडे पुण्य असेल तर तुम्हाला साधुसंतांची भेट लवकर होवू शकते. संतांशिवाय प्राप्ती नाही असे प्रतिपादन ह.भ.प.गौरव महाराज खेडकर यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले.
कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अख़ंड हरिनाम यज्ञ सप्ताह सोहळ्यात ह.भ.प. खेडकर महाराज बोलत होते.
अभिषेक,कलशपूजन,वीणापुजन, ज्ञानेश्वरी पुजन करून पारायणाने शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सोहळ्यास शनिवार दि.९ आॅगस्ट पासून सुरूवात झाली.
रविवारी आयोजित केलेल्या कीर्तनात बोलताना ह.भ.प.गौरवमहाराज खेडकर म्हणाले, देवाची आपल्याला ओळख करून घ्यायची. किर्तनासाठी सुंदर असे वादक बोलावलेत ते कोणाच्या संबंधाने? देवाच्या संबंधाने.देवच नसता तर सप्ताह असता का? सप्ताह नसता तर वादक असते का? वादक कोणाच्या संबंधाने?पेटीवादक कोणाच्या संबंधाने? गायक कोणाच्या संबंधाने? टाळकरी कोणाच्या संबंधाने? चोपदार कोणाच्या संबंधाने? त्या देवाची ओळख आहे का? माळ,गंध,बुक्का,अष्टगंध कोणाच्या संबंधाने? असे सवाल खेडकर महाराज यांनी उपस्थित श्रोत्यांना करून त्या देवाची ओळख अजून नाही असे खेडकर महाराज यांनी सांगितले.
मुलीच्या लग्नाला गेल्यावर जेवणाला कधी नाव ठेवायचे नाही. का नाही ठेवायचे तर आख्ख्या आयुष्याची कमाई त्या बापानं त्या जेवणाला घालवली असते. बाप तो बापचं असतो. आई वडिलांची सेवा करत जा. पा़ंडूरंग आपला झाला पाहिजे. देव आपलासा करून घ्या. साधूसंत म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे ना तर एकाच देवाची भक्ती झाली पाहिजे.तुमच्या हृदयात असणारे आत्मतत्त्व आहे तो हरि आहे असे ह.भ.प.गौरव महाराज खेडकर यांनी उपस्थित श्रोत्यांना सांगितले.
व्यासपीठ चालक ह.भ.प. सोपानराव गाडगे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यास ह.भ.प.दत्तात्रय लहानबा गायकवाड,ह.भ.प.गुलाबराव भागुजी गायकवाड, संपतराव आबासाहेब गायकवाड,राजेंद्र विठ्ठलराव गायकवाड, रामदास सर्जेराव गायकवाड,रामेश्वर ढाकणे,दीपक पवार यांच्यासह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने कीर्तनास उपस्थित होते.