शेततळ्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील घटना
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- शेततळ्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील कारेगाव-बाभुळसर खुर्द शिवेवरील शेततळ्यात २८ जुलैला रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
कृष्णा उमाजी राखे वय -८ वर्षे, अनमोल उर्फ बाबू प्रवीण पवार वय -१३ वर्षे अशी शेततळ्यात बुडून मृत्यु झालेल्या दोघांची नावे असून आदेश प्रवीण पवार वय -१४ वर्षे, स्वराज गौतम शिरसाठ या दोघांना वाचविण्यात स्थानिक तरूणांना यश आले असून त्यांच्यावर शिरूर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारी ७ ते ८ मुले शाळा सुटल्यानंतर आपापल्या घरी गेली. ६ वाजण्याच्या सुमारास सायकली घेवून कारेगाव -बाभूळसर रस्त्यावरील शेततळ्यात पोहण्यासाठी गेली.पावसाच्या पाण्याने शेततळे काठोकाठ भरलेले असून पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कृष्णा राखे पाण्यात प्रथम बुडू लागला. बाबू त्याला वाचवण्यासाठी पुढे गेला असता तोही पाण्यात बुडू लागला.दुस-या बाजूला स्वराज शिरसाठ हा देखील पाण्यात बुडू लागला.त्यांना वाचविण्यासाठी आदेश पवार याने पाण्यात उडी मारली. मात्र पाणी खोल असल्याने तो लगेच बाहेर आला.त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला.
पवार हे मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील नेहर तालुक्यातील देवडी येथील तर राखे हे मूळचे नांदेडचे रहिवासी आहेत. रोजगारासाठी ही कुटुंबे रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामासाठी आलेली आहेत.
पोलीस हवालदार गणेश आगलावे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
.