जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा तणाव पुन्हा एकदा वाढला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "माझे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. काश्मीरच्या मुद्दयावरुन दोन्हीं देशांतील संबंध हजारों वर्षांपासून ताणले आहेत. काश्मिरचा प्रश्न हजारों वर्षांपासून काय कदाचित त्याहूनही जास्त काळापासून सुरू असावा", असं ट्रम्प म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, "पहलगाममध्ये झालेला हल्ला अतिशय भयावह होता. त्या सीमेवर 1500 वर्षांपासून तणाव असून हा तणाव कायम आहे. पण मला खात्री आहे की ते यातून काहीतरी मार्ग काढतील. मी दोन्ही नेत्यांना ओळखतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव आहे, पण तो नेहमीच राहिला आहे."
ब्रिटिश राजवटीपासून 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभाजन झालं. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे.
दरम्यान, मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू-काश्मीरच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसर भागात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.
या घटनेनंतर भारत सरकारकडून पाकिस्तानसोबतच्या सिंधू नदीवरील जल कराराला स्थगित करण्याचा तसेच अटारी-वाघा सीमा त्वरित बंद करण्यासारखे विविध निर्णय घेतले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननंही अनेक पावले उचलली आहेत.