• Total Visitor ( 481759 )
News photo

सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या 

Raju tapal March 31, 2025 84

सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या 



सर्व सावकारांवर कारवाई करण्याची कुटुंबीयांची मागणी.  



कल्याण : मोहने जेतवननगर येथील युवकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत युवकाने सावकाराच्या अनैतिक आणि अमानवी वागणुकीचा उल्लेख केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून कुटुंबीयांनी सावकारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.  

 जेतवननगर येथील रहिवाशी रिक्षाचालक विजय जीवन मोरे यांनी सावकाराच्या जाचाचा  कंटाळून आत्महत्या केली आहे कुटुंबीयांना यात दोषी धरू नये तसेच सावकारावर कडक कारवाई करण्यात यावी असे आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत उल्लेख केला आहे.

रिक्षाचालक विजय मोरे काही दिवसांपासून सावकारांच्या तगाद्यामुळे त्रस्त होता. तो प्रचंड मानसिक तणावामध्ये होता. दैनंदिन रोजची परतफेड तसेच महिन्याला 20 ते 30 टक्के दराने त्याने सावकारांकडून पैसे घेतले होते घेतलेल्या कर्जावर मोठ्या प्रमाणात व्याज आकारले जात होते. व्याजफेडीचा प्रचंड ताण सहन न झाल्याने अखेर विजय यांनी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा  संपवली. 

युवकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी सावकारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. "जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही," असा ठाम निर्धार कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दोन महिन्यांत अशा स्वरूपाची ही दुसरी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  

प्रशासनाची भूमिका आणि पुढील कारवाई  

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सर्व सावकारांची चौकशी करून त्यांच्या कर्जवसुली पद्धतींचा आढावा घेण्याचे आदेश खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अमरनाथ वाघमोडे पोलिसांना दिले आहेत. रिक्षा चालक गोर गरीब यांना चढा व्याज दराने कर्ज देऊन सक्तीची वसुली करणाऱ्या सर्व सावकारांची माहिती संकलित करण्यात येईल तसेच आत्महत्येला जबाबदार असलेल्या सर्व सावकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी आपले आंदोलन मागे घेतले. कर्जवसुलीच्या अनैतिक आणि बेकायदेशीर पद्धतींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  

सावकारांच्या जाचामुळे तरुणांने जीवन संकटात येत असल्याने समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर नियम आणि कारवाईची मागणी सर्वत्र होत आहे. सरकार आणि प्रशासनाने अशा घटनांना गालबोट लागू नये यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

 



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement