जिल्हा परिषद,ठाणे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा प्रतिज्ञेसह तंबाखूमुक्ती,मृदा व जलसंधारणाची शपथ
ठाणे:- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद,ठाणे येथे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या शुभहस्ते आज ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी ‘वंदे मातरम्’चे गायन,राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात राबविण्यात येत असून,नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करण्यासोबतच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येत आहे. जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी तिरंगा प्रतिज्ञा घेतली. तसेच तंबाखूमुक्ती,मृदा संवर्धन आणि जलसंधारणाबाबत शपथ घेऊन सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारी जपण्याचा संकल्प केला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत राष्ट्रध्वज पोहोचविण्यासोबतच नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम,राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचबरोबर तंबाखूमुक्त समाजनिर्मिती, मृदा संवर्धन आणि जलसंधारण यांसारख्या विषयांवर जनजागृती करून निरोगी,स्वच्छ आणि पर्यावरणपूरक समाजनिर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे,कार्यकारी अभियंता बांधकाम दिपाली घोरपडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे,जिल्हा कार्यक्रम अधिकारी शोभा शेलार,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे,कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटिकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड,गट विकास अधिकारी काजल दहिवले यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.