गरीब वीजग्राहकांना 25 वर्ष वीज मोफत
१०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी राज्य सरकारची SMART सोलर योजना लागू
मुंबई : राज्यातील १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांसाठी राज्य शासनाने “स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (SMART) सोलर योजना” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे ग्राहकांना घराच्या छतावर सोलर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासोबत राज्य शासनाकडूनही अतिरिक्त आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामुळे गरीब व कमी वीज वापरणाऱ्या कुटुंबांना वीजबिलात मोठी बचत होणार असून अतिरिक्त वीज निर्मितीतून उत्पन्नाचे साधनही निर्माण होणार आहे.
या योजनेत दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना राज्य शासनाकडून ३१ टक्के तर अनुसूचित जाती व जमातीतील लाभार्थ्यांना ३० टक्के अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. प्रति किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ३० हजार रुपयांचे अनुदान मिळणार असून उर्वरित रक्कम ग्राहक व राज्य शासन उचलणार आहे.
राज्य शासनाने या योजनेसाठी २०२५-२६ या वर्षात ३३० कोटी रुपये व २०२६-२७ मध्ये ३५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे. महावितरण कंपनीमार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या योजनेमुळे राज्यातील लाखो घरगुती वीज ग्राहकांना दिलासा मिळणार असून पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना मिळणार आहे.