मुंबई-गोवा महामार्ग बनला मृत्युचा सापळा ; वर्षभरात ३९९ अपघातात महामार्गाने घेतले १३७ जणांचे बळी
रत्नागिरी - कोकणातून जाणारा राष्ट्रीय मुंबई-गोवा महामार्ग वाहन चालकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे. गेली आठरा वर्ष सुरु असलेल्या महामार्गाचे काम आज ही पुर्ण होण्याचे नाव घेत नाही. मात्र गेल्या वर्षभरात या महामार्गाने रत्नागिरी जिल्ह्यातील १३७ वाहन चालकांचे बळी घेतले आहेत. महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे ३९९ पेक्षा जास्त अपघातांची नोंद करण्यात आली आहे. महामार्गाचे अर्धवट सुरु असलेले काम आणि होणा-या अपघातांची संख्या बघता हा विषय आता गंभीर बनला आहे.
कोकणाला जलद गतीने मुंबईला जोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा घाट घातला. या महामार्गावर आता पर्यत कोठ्यावधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र तरीही या महामार्गावरील कामे आज ही अर्धवट सुरु आहेत. कोकणातील चाकरमानी दरवर्षी आदळत आपटत शिमगोत्सव अथवा गणेशोत्सवाला येत आहे. या महामार्गाचे काम पुर्ण होण्यासाठी अनेक मंत्र्यांनी पहाणी दौरे करुन वेळेत काम पुर्ण करण्याची आश्वासने दिली. मात्र मुंबई गोवा महामार्गाचे काम आजही पुर्ण होण्याच्या प्रतिक्षेत आहे. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होई प्रयत्न अपघाताचे प्रमाण वाढतच जात आहे. जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अखेर कोकणातील फक्त रत्नागिरी जिल्ह्यात ३९९ अपघात झाले असून त्यात गंभीर स्वरुपाचे १२७ अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या अपघातांमध्ये आता पर्यत १३७ लोकांनी आपले जीव गमावले आहेत. कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकडेवारी बघता बळीँची संख्या हजाराच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
या महामार्गाने गंभीर अपघातामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आतापर्यंत ११५ पुरुषांचे आणि २२ महिलांचे बळी घेतले आहेत. हे सर्व अघातातील बळी मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहेत. जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ याच कालावधीत ११९ लहान अपघात देखील झाले आहेत. त्यामध्ये १९२ लोक गंभीर जखमी झाले असून यामध्ये २१० पुरुष तर ८२ महिलांचा समावेश आहे. महामार्गावरील किरकोळ स्वरुपाचे ८९ अपघात झाले आहेत. त्यात २६४ लोकांना दुखापत झाल्या आहेत. यात १८७ पुरूष तर ७७ स्त्रियांचा समावेश आहे. तसेच या महामार्गावरील इतर ६४ अपघातांमध्ये फक्त वाहनांचे नुकसान झाले आहे. मात्र यात कोणीही जखमी अथवा मृत्यु झालेले नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील ही अपघाताची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून ही आता चिंताजनक बाब बनली आहे. कोकणात पाच मंत्री असताना महामार्गाचा विषय अवघड होवून बसला आहे. जिल्ह्यातील संगमेश्वर ते रत्नागिरी याभागात सर्वात जास्त अपघात झाल्याचे उघड झाले आहे. मात्र गेली अठरा वर्ष पुर्णत्वाच्या प्रतिक्षेत असलेला मुंबई गोवा महामार्गाला आणखी किती बळी हवे आहेत? असा प्रश्न कोकणवासियांना पडला आहे.