सावरकर नगर येथील रहिवाशी सांडपाण्याच्या त्रासाने हैराण
टिटवाळा :- सावरकर नगर,शिवकृपा चाळ येथे गेल्या ३ वर्षांपासून गटारीचे घाण पाणी सतत वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. येथील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी दाखल करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या गटारीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर रहिवाशांना दुर्गंधी,डासांचा प्रादुर्भाव व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करावी,ही नागरिकांची अपेक्षा आहे.