• Total Visitor ( 431246 )
News photo

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

Raju tapal July 08, 2025 72

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार;

निवडणूक आयोगाने बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक 



मुंबई :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचे याबाबतही सांगण्यात आलं आहे.



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 हाच या बैठकीचा विषय असून 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती व 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीच्या (महानगरपालिका वगळून) पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा मा.राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. या बैठकीमध्ये खालील विषयांचा आढावा घेण्यात येईल, असे परिपत्रकच राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.



उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सोबतच्या परिपत्रामध्ये माहिती तयार करून ती आयोगास PDF Format मध्ये ई-मेलद्वारे 9 जुलै 2025 रोजी किंवा तत्पूर्वी सादर करण्यात यावी. तसेच उक्त नमूद सर्व मुद्यांसंदर्भातील माहितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीस आपण व्यक्तिशः उपस्थित राहावे, ही विनंती. सदर व्हिडिओ कॉन्फरन्सची लिंक यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल,असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना  लिहिले आहे. तसेच, उपरोक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीस आपण उपस्थित राहावे, असेही सांगण्यात आले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement