कार - बसच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
शिक्रापूर:- नाशिकहून पुण्याला येत असलेल्या कारने बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंचरजवळील एकलहरे गावच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री साडेअकरा,बारा वाजण्याच्या सुमारास घडली. मल्लिकार्जुन शिवराम आंबेगावे वय -४६,आरती मल्लिकार्जुन आंबेगावे वय -४२,लता बाळू तुपलोंढे वय -६३ अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनूसार,मल्लिकार्जुन शिवराम आंबेगावे रा.पिंपरी पुणे हे त्यांच्या कुटूंबासह नाशिकहून पुण्याकडे कारने येत होते.एकलहरे गावच्या हद्दीत कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या बसला धडकली. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून दोन्ही टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. प्रेम मल्लिकार्जुन आंबेगावे वय -२०,मृणाल मल्लिकार्जुन आंबेगावे वय -१६ ही दोन लहान मुले या अपघातात जखमी झाली असून त्यांच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट असून मंचर पोलीसांनी अपघातस्थळी येवून पंचनामा केल्याचे समजले.